विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या महिन्यापासून रिक्त असलेले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) निरीक्षकपदी कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्याचे किशोर धुमाळ यांची नियुक्त झाली आहे. त्यांनी एलसीबीच्या कारभाऱ्यासाठी सुरू असलेल्या चुरशीला पूर्णविराम मिळाला आहे.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या कार्यकाळात सुरवातीला विजय कुंभार यांनी एलसीबीचे काम पाहिले; परंतु काही काळातच त्यांच्याऐवजी सर्जेराव पाटील यांच्याकडे पदभार देण्यात आला. त्या वेळी ते सोलापूर ग्रामीणमधून साताऱ्यात बदलून आले होते. मागील महिन्यात सातपुते यांची सोलापूर ग्रामीणला बदली झाली. त्यांच्या पाठोपाठ सर्जेराव पाटील यांनी सोलापूर ग्रामीणची वाट धरली. तेव्हापासून एलसीबीचे निरीक्षकपद रिक्त आहे. अजयुकमार बन्सल यांनी पोलिस अधीक्षकपद स्वीकारल्यानंतर सर्जेराव पाटील सोलापूरला गेले. जिल्ह्यातील महत्त्वाचे असे हे पद मिळण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले. अनेकांच्या माध्यमातून नेत्यांकडे शब्द टाकण्याची गळ घातली जात होती. त्याच पद्धतीने एलसीबीच्या कारभारपणासाठी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरून फिल्डिंग लागली होती.
पूर्वीच्या कामाचे दाखले, ज्येष्ठता, जिल्ह्यातील अनुभव अशा विविध परिमाणांची कसोटी त्यासाठी लावली जात आहे. आपलाच माणूस असावा, यासाठी जिल्ह्यातील अनेक नेतेही त्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु, लगेचच विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे एलसीबीच्या निरीक्षकांची निवडही लांबणीवर पडली होती. या निवडणुकीसाठी लागलेल्या आचारसंहितेची मुदतही संपली आहे. त्यामुळे निरीक्षकांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार अधिक्षकांनी तातडीने निर्णय घेत एलसीबीचे निरीक्षक म्हणून किशोर धुमाळ यांची नियुक्त केली आहे. गेल्या महिन्यापासून रखडलेल्या एलसीबीच्या कामकाजाला गती देण्याचे काम धुमाळ यांना करावे लागणार आहे.
चौकट
साताऱ्याचा जावई असणाऱ्या पुणे ग्रामीणच्या एका फौजदारासाठी या पदाकरिता थेट राजकीय फिल्डिंग लागली होती .एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने एका आमदारापर्यंत तगडी मोर्चेबांधणी करून या अधिकाऱ्यासाठी देव पाण्यात घातले होते . अगदी काम सोळा आणे नक्की इतकी खात्री होती मात्र ऐनवेळी जावयाच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार न झाल्याने आत्तापर्यंत लागलेली राजकीय फिल्डिंग वाया गेली .