आपल्या खणखणीत नाण्याचा आवाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहचतो ; उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंना विजयी करण्याचे श्री छ वेदांतिकाराजेंचे आवाहन

128
Adv

सातारा : भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेवून विकास म्हणजे काय हे दाखवून दिले आहे. त्यामुळेच देशात पुन्हा नरेंद्र मोदींचे सरकार आले असून राज्यातही पुन्हा भारतीय जनता पार्टीचेच सरकार येणार आहे. देश आणि राज्याप्रमाणे आपल्या साताऱ्याचाही विकास गतीने झाला पाहिजे. या उद्देशानेच दोन्ही राजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आजवर कितीतरी लोकांनी पक्ष बदलले आहेत. मात्र दोन्ही राजांनी पक्षबदल केला म्हणून विरोधकांचा आकांडतांडव सुरु आहे. आपले नाणे खणखणीतच आहे आणि या नाण्याचा आवाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहतो आणि सगळं हादरवून सोडतो. राजांनी पक्ष सोडला म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

मतदारसंघाचा विकास हेच ध्येय दोन्ही राजांनी ठेवले असून या ध्येयपुर्तीसाठी दोघांनाही मताधिक्याकडे विजयी करा, असे आवाहन श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.

करंजे येथील मेहेर देशमुख कॉलनी येथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा पोटनिवडणूकीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले आणि सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजिक कोपरा सभेत सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, नगरसेवक अशोक मोने, निशांत पाटील, श्रीकांत आंबेकर, मनोज शेंडे, राजू भोसले, स्मिता घोडके, ज्ञानेश्वर फरांदे, विजय काटवटे, माजी नगराध्यक्षा सौ. वैशाली महामुनी, नासीर शेख, प्रकाश बडेकर, जेष्ठ नेते शंकरकाका किर्दत, अतुल चव्हाण, राम हादगे, प्रताप महामुने, बाळासाहेब भुजबळ, सोमनाथ पाटोळे यांच्यासह नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

राजघराणं आणि सातारकर एक अतुट नातं असून सातारा शहर हे राजघराण्याचं कुटूंब आहे. सर्वजण एकोप्याने राहतात. दोन्ही राजेंच्या माध्यमातून सातारा शहरात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. शहरात सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय आहे. आता मेडीकल कॉलेज होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवस्पृटी, नवीन मोठमोठ्या कंपन्या साताऱ्यात आणणे, यासारखी मोठी कामे करायची असतील तर, सत्तेशिवाय पर्याय नाही. केंद्रात भाजपची सत्ता आहे आणि आता राज्यातही भाजपतीच सत्ता येणार आहे. पाच वर्षात कधीही तोंड न दाखवणारे पावसाळ्यातील भूछत्राप्रमाणे निवडणूकीत उगवतात. मग त्यांच्या मागं जायचं का विकासाच्या मागं जायचं हे तुम्ही आम्ही ठरवले पाहिजे. आपल्या दोन राजांच्या आणि भाजपच्या माध्यमातूनच शहराचा गतीने विकास होणार आहे. त्यामुळे दोन्ही राजांना विजयी करुन विरोधकांना पुन्हा घरी पाठवा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले. यावेळी सौ. कदम, बाळासाहेब भूजबळ, काटवटे, डॅनी पवार, आंबेकर यांनी मनोगत व्यक्त केले. शंकरकाका किर्दत यांनी आभार मानले. कार्यक्रमास करंजे येथील युवक, युवती, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Adv