मुंबई | यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथास परवानगी मिळालेली नाही. दरवर्षी कोणत्या राज्याचा चित्ररथ संचलनात सहभागी होईल हे संबंधित मंत्रालय ठरवत असतं. शिवाय 2005, 2008, 2013 या वर्षीही राजपथावरच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता. मात्र यावरुन राजकारण सुरु झाल्याचं दिसतंय.
प्रजासत्ताक दिनी दिल्ली इथे होणाऱ्या संचलनात देशातील विविध राज्यांचे चित्ररथ सामील होतात. मात्र महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारणे हा महाराष्ट्राच्या मातीचा अपमान आहे, असं म्हणत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुुप्रिया सुळे यांनीही या मुद्द्यावरुन भाजप सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे. या राज्यांना परवानगी नाकारण्याची कृती हा येथील जनतेचा अपमान आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहीर निषेध, असं त्या म्हणाल्या आहेत.