बेळगावातील मनगुत्ती या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पोलिसांनी रातोरात हटवला. यानंतर, तिथल्या मराठी भाषिकांनी याचा विरोध करून संताप व्यक्त केला. त्यानंतर महाराष्ट्रातील शिवभक्तही संताप व्यक्त करत आहेत. तर राज्यातील अनेक नेत्यांनी कर्नाटकात भाजपाचे सरकार असून छत्रपती शिवरायांचा फक्त मतांसाठी वापर केला जातो असा आरोप करण्यास सुरुवात केली होती.
यावर आता, एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. त्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणावरून काहीसा गोंधळ झाल्याने तो पुतळा काँग्रेसी आमदार सतीश जारकीहोळी यांच्या सांगण्यावरून हटवण्यात आल्याचा आरोप भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे, आता यावर राज्यातील शिवसेना काय भूमिका घेणार? असा सवाल विचारत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाजपावर केलेल्या आरोपांना निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
निलेश राणे यांनी, “डांबरचोर उदय सामंत, कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोळी यांनी हटवला आहे. आणि त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून हा डांबरचोर सत्तेत आहे. हिंमत असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा दे. जय शिवराय! ” असे ट्विट करत सामंत यांच्यासह शिवसेनेवर जळजळीत टीका केली आहे.