यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मूर्तीची उंची कमी होणार आहेच, पण त्याचबरोबर मंडळांना अनेक नियमांचे काटेकोर पालनही करावे लागणार आहे भक्तांना यंदा मंडपात जाऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. तसेच हार, फुलेही अर्पण करता येणार नाहीत. गणपतीची आरती, आगमन, विसर्जन या कार्यक्रमांना केवळ 10 कार्यकर्त्यांनाच उपस्थित राहता येणार आहे.
यंदाचा गणेशोत्सव पूर्णत्वास नेणे ही तारेवरची कसरत असणार आहे. कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गणेशोत्सवात गर्दी झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढणार आहे. त्यामुळेच राज्य सरकारने यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.
गणेशोत्सव मंडळांसाठी नियम
मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहू नयेत. मंडपात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक.
मंडपाच्या मुख्य भागाचे दिवसातून 3 वेळा निर्जंतुकीकरण करावे, कार्यकर्त्यांना सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे.
मंडपाच्या लगत फुले, हार, प्रसाद यांच्या विक्रीचे स्टॉल लावता येणार नाहीत.
आरतीला मंडपात जास्तीत जास्त 10 कार्यकर्त्यांना प्रवेश असेल. आगमन, विसर्जन याप्रसंगी मिरवणूक काढता येणार नाही. केवळ 10 कार्यकर्ते सहभागी होऊ शकतील.
मंडप सजावट, देखावे, रोषणाई यांना मुरड घालून मंडळातर्फे जनजागरण, रक्तदान, आरोग्य तपासणी असे कार्यक्रम आयोजित केले जावेत. व्यावसायिक जाहिरातींनाही प्रतिबंध.
भक्तीपर किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही.
कमीत कमी निर्माल्य तयार होईल याची काळजी घेणे.
ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळून कोरोना रुग्ण, अन्य रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे.