शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी  — राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

82
Adv

केंद्र व राज्य शासन सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून विविध योजना तयार करत असतात. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका विभाग प्रमुखांनी घ्यावी, अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्या.
            राज्यपाल महोदयांनी आज महाबळेश्वर येथील राजभवनातील दरबार हॉलमध्ये विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी  संजय भागवत, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपवन संरक्षक भरतसिंह हाडा, प्रांताधिकारी संगीता चौगुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी शिवभोजना योजनाचा आढावा घेतांना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले शिवभोजन थाळीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून लोकांच्या अधिकच्या मागणीचा विचार करुन तसा प्रस्ताव पाठवावा. युवकांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहित करुन मुद्रा बँक योजनेंतर्गत जास्तीत जास्त वित्त पुरवठा करुन उद्योजक निर्माण करावेत. तसेच सातबारा संगणकीकरणाचे काम 98 टक्के पूर्ण झाले असून लवकरात लवकर हे काम 100 टक्के करा.
            महिला बचत गटांचे काम चांगल्या पध्दतीने सुरु असून दर्जेदार माल उत्पादित करीत आहे. त्यांना कायमस्वरुपी बाजारपेठ मिळावी यासाठी उपाययोजना कराव्यात. पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण ) या  योजनेचे काम सातारा जिल्ह्यात चांगले झाले असून या पुढे त्याच गतीने काम करावे. आरोग्य विभागाचा आढावा घेतांना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, क्षयरोग ज्या व्यक्तींना झाला आहे ती व्यक्ती घाबरुन रुग्णालयात येत नाही. अशा व्यक्तींची ओळख पटवून त्यांचे समुपदेशन करुन त्यांच्यावर औषधोपचार करावा.  जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विभागांना मिळालेला निधी 100 टक्के खर्च करावा असे सांगून, महाबळेश्वर येथील वाहनतळाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्यात पाटबंधारे विभागाने तसेच जिल्हा परिषदेने स्वच्छ भारत मिशनमध्ये चांगले काम केल्याबद्दल राज्यपालांनी अभिनंदन करुन महाबळेश्वर हे भारतातील महत्वाचे पर्यटन स्थळ असून अधिक पर्यटक येण्यासाठी उत्तम सोयीसुविधा पुरवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.
            बैठकीच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत व अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीची त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे राज्यपाल महोदयांना दिली.

Adv