कोयना धरणाच्या सुरक्षेची दक्षता घेऊन जलवाहतूक –उपमुख्यमंत्री अजित पवार

89
Adv

कोयना धरण परिसरातील गावांसाठी दळणवळणाचा मार्ग खुला व्हावा, रोजगार उपलब्ध व्हावा, पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने कोयना धरणात जलवाहतूक सुरू करण्यासंदर्भात धरणाच्या सुरक्षेची काळजी घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोयना धरण जलवाहतूक संदर्भात विधान भवनात बैठक झाली. यावेळी वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार,कायदा सुव्यवस्थेचे अतिरीक्त पोलीस महासंचालक मिलींद भारंबे, साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोयना धरणाच्या सुरक्षेला बाधा येणार नाही, याची काळजी घेऊन धरणात जलवाहतूक सुरू करण्यासंदर्भात विचार व्हावा. यासाठी साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गृह, जलसंपदा, वन विभागाच्या समन्वयाने अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा. जलवाहतुकीसाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करताना; त्यासाठीचे अंतर ठरविताना प्रथम धरणाच्या सुरक्षेचा विचार करावा, सध्या असलेली जेटी पोलीस पेट्रोलींगसाठी योग्य असून जलवाहतुकीसाठी नवीन जेटीबाबत प्रत्यक्ष पाहणी करून जागा निश्चित करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी दिल्या.

Adv