सातारा शहरातील शाहूकला मंदिरा नजीक असलेल्या विठ्ठल मंदिरासमोरील रस्त्यांवर बसविण्यात आलेल्या रम्बलर्समुळे दुचाकी चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.अनेक ठिकाणी रम्बलर्स उंच-खोल झाले असून रस्त्यांची अवस्था देखील खराब झाली आहे. त्यामुळे वाहन चालविताना नागरिकांना विशेष करून महिला वर्गांना मोठी कसरत करावी लागत आहे.
विशेषतः दुचाकी चालकांना अचानक ब्रेक लावावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने वाहनधारकांना रम्बलर्स दिसत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे आणि रम्बलर्स एकत्र असल्याने वाहने घसरून किरकोळ अपघात होत असल्याचेही समोर आले आहे.
वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे सातारा पालिकेने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून निकृष्ट व धोकादायक रम्बलर्स काढावेत, तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.






