Monday, July 6, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश

46
Adv

सातारा, दि. ६ भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज व रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीदरम्यान करावयाच्या तात्काळ उपाययोजना व आपत्ती व्यवस्थापना बाबत व्यापक आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई व सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, भूस्खलन तसेच संपर्क यंत्रणा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.

धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव व नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले असून, अपघातप्रवण ठिकाणी ‘प्रवेश निषिद्ध’ व ‘धोकादायक क्षेत्र’ असे फलक लावण्या बाबत निर्देश दिले आहेत.तसेच प्रमुख पर्यटनस्थळांवर गर्दी नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरडप्रवण व अतिधोकादायक भागांतील नागरिक तसेच मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थलांतरित नागरिकांसाठी शाळा, महाविद्यालये, समाजमंदिरे व इतर तात्पुरत्या पुनर्वसन केंद्रांमध्ये निवास, पिण्याचे पाणी व वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
अतिवृष्टीच्या काळात घाटरस्त्यांवरील अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले असून, ओढे, नाले व नद्यांना पूर आल्यास किंवा पुलांवरून पाणी वाहत असल्यास संबंधित मार्ग तात्काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. अशा ठिकाणी बॅरिकेडिंग करून पोलीस व होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत.
सोशल मीडिया, दवंडी, स्थानिक प्रसारमाध्यमे व व्हॉट्सअॅप गटांच्या माध्यमातून नागरिकांना हवामान अंदाज, धरण विसर्ग व नदीपात्रातील पाणीपातळीबाबत सातत्याने माहिती देण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. सर्व तहसील कार्यालये, नगरपरिषदा व पंचायत समित्यांनी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवावेत तसेच तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सदर आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी नमूद केले आहे.

Adv