पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने मुनावळे (ता.जावळी) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. परंतु विविध विभागाच्या परवानग्या प्रलंबित असतानाच ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. त्यामुळे सामाजिक, माहिती अधिकार, पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी बुधवार दि.२ एप्रिल रोजी शिवसागर जलायशात जलसमाधीचा इशारा दिला होता. या आंदोलन वेळी संबंधित विभागाने याबाबत सर्व परवानग्या घेतल्यानंतरच ठेकेदाराला काम सुरु करण्यास सांगितल्याचे लेखी पत्र दिल्याने श्री. मोरे यांच्या आंदोलनाचा दणका बसल्याने श्री मोरे यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
मौजे मुनावळे हे ठिकाण केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पर्यावरण व जैवविविधतेच्या संरक्षणासाठी इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन्स म्हणून जाहीर केले आहे. याठिकाणी कोणताही पर्यटन प्रकल्प राबवताना वन पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय भारत सरकार, केंद्रीय वन्यजीव मंडळ, राज्य वन्यजीव मंडळ, स्थानिक सल्लागार समिती सह्याद्री व्याघ्र राखीव, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोयना जलसंपदा विभाग, स्थानिक ग्रामपंचायत या प्राधिकरणांच्या ना-हरकत परवानग्या मिळविणे गरजेचे असताना सद्य:स्थितीत कोणत्याही विभागाची परवानगी मिळाली नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत मोरे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने याबाबत गंभीर दखल घेतली आहे. ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय पर्यटन प्रकल्पातील कामे सुरू करू नयेत, असे लेखी आदेश मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य यांना दिले आहेत. यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. मुनावळे याठिकाणी वॉटर स्पोर्ट सुरू करण्याकरिता साताऱ्यातील एका खासगी एजन्सीच्या नावावर कार्यारंभ आदेश जाहीर झाला आहे. मात्र निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळण्यापूर्वीच श्री. मोरे यांचा तक्रार अर्ज प्रलंबित होता. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून पर्यावरणीय, वन्यजीव तरतुदींचा भंग करून निविदेला तांत्रिक मंजुरी देणारे जलसंपदाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक व कोयना सिंचनचे कार्यकारी अभियंता नितेश पोतदार यांच्या निलंबनाची मागणीही श्री. मोरे यांनी केली होती. तसेच सर्व विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्रे मिळाल्याशिवाय कामे सुरु करु नका अन्यथा दि.२ एप्रिल रोजी जलसमाधी घेण्याचा इशारा श्री. मोरे यांनी दिला होता. त्यानुसार श्री. मोरे यांनी आंदोलनासाठी कोयनानगर गाठले, आंदोलनाची तयारी करताच प्रशासनाच्यावतीने संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला असला तरी सर्व विभागाच्या परवानग्या घेऊनच काम सुरु करावे असे आदेशात नमूद केल्याचे लेखी पत्र देण्यात आले, त्यामुळे श्री.मोरे यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. सर्व परवानगी आलेवरच काम सुरू करणेत येणार आहे असे ठोस आश्वासन अधीक्षक अभियंता श्री नाईक यांनी दूरध्वनी द्वारे श्री मोरे यांना दिले.यावेळी श्री. मोरे यांना सातारा शहर आणि कोयनानगर पोलीस ठाण्याचे सहकार्य मिळाले.