सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक; अन्यथा कारवाई -जिल्हाधिकारी

61
Adv

 कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन त्यात अधिक वाढ होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासह भेट देणारे अभ्यांगत तसेच अत्यावश्यक बाबी व सेवांसाठी बाहेर फिरणाऱ्या नागरीकांनी मास्क चेहऱ्यावर परिधान करणे बंधनकारक आहे, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहे.

कोरोना (कोविड-19) विषाणूचा प्रसार राज्यातील कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांना संसर्ग होऊ नये म्हणून शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.  या पार्श्वभूमीवर मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढता विचारात घेता, सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय, नगरपालिका, नगरपंचायत, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम व इतर सर्व कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासह कामानिमित्त भेट देणाऱ्या सर्व अभ्यागतांनादेखील कार्यालयीन प्रवेशापासून ते कार्यालय सोडेपर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  मास्कशिवाय कोणालाही कार्यालयात प्रवेश देण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना या आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत.
याच धर्तीवर सातारा जिल्हयातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक बाबी व सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी घरामधून बाहेर पडतानापासून परत घरी येईपर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. याचे उल्लंघन करताना निदर्शनास आल्यास पोलीस प्रशासनाने नियमानुसार संबधितांवर कायदेशीर कारवाई करावयाची आहे, असेही आदेशात नमुद आहे.
तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम करत असताना कागदपत्रे व हस्तांदोलन यामुळे संसर्ग वाढण्याची  शक्यता नाकारता येत नसल्याने कार्यालयाममध्ये वेळोवेळी सॅनिटायझर अथवा हॅण्डवॉशचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

Adv