सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण द्यावे -महायुतीच्या मित्रपक्षांची राज्यपालांकडे मागणी*

100
Adv

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून ८ दिवस झाले तरी सरकार स्थापन होत नाही. त्यामुळे राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण द्यावे अशी मागणी केंद्रियराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात महायुतीच्या मित्रपक्षांनी आज राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. यावेळी राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ही मित्रपक्षांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना निवेदन देऊन केली.

राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे लावकरच भरपाई देण्यासाठी केंद्राला ही कळविले आहे. राज्यात सरकार लवकर स्थापन झाले पाहिजे. मात्र अद्याप माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. असे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.
सरकार स्थापन करण्याबाबत चांगला तोडगा रामदास आठवलेंनी
आपल्या कवितेतून द्यावा; ते चांगले कवी सुद्धा आहेत असे यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात रासप चे प्रमुख महादेव जानकर; रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत;शिवसंग्राम चे संदीप पाटील; रिपाइंचे सरचिटणीस अविनाश महातेकर; सुमंतराव गायकवाड; भुपेश थुलकर; गौतम सोनवणे; सुरेश बारशिंग; एम एस नंदा; जगदीश गायकवाड; हेमंत रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

येत्या दि.10 नोव्हेंबर पर्यंत राज्यात सरकार स्थापन होणे आवश्यक आहे. तसे झाले नाहीतर राष्ट्रपती राजवट नियमानुसार लागू होऊ शकते यात राष्ट्रापती राजवट लागू करण्याची कोणतीही धमकी नसल्याचे मत ना रामदास आठवले यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. शिवसेने ने उपमुख्यमंत्री पद आणि 16 मंत्रीपदे घेऊन भाजप शी तडजोड करून सरकार मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.
राज्यपालांना भेटल्यानंतर केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वात मित्रपक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांनी सरकार स्थापन करण्याबाबत सूचना केली.

Adv