सुनेत्रा पवार यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसने “गुंगी गुडिया” अशी टीका करत थेट निशाणा साधला. मात्र या गंभीर राजकीय टीकेनंतरही सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची शांतता अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्ह्यातील नेतृत्वाने स्वतःच्या राष्ट्रीय नेत्या यांच्यावर झालेल्या टीकेचा साधा निषेधही व्यक्त केला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पक्षनिष्ठेच्या घोषणा करणारे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाचा पुरस्कार करणारे अनेक नेते या प्रकरणावर मौन बाळगून असल्याने कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे.
आता सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस निवास शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील नेतृत्व या प्रकरणावर स्पष्ट भूमिका घेणार का, की ही शांतता कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






