राजवाडा भाजी मंडई व फ्रुट मार्केटच्या रंगरंगोटीवर सातारा पालिकेने लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र, ज्या फ्रुट मार्केटला नवसंजीवनी देण्यासाठी हा खर्च करण्यात आला, तेथेच फ्रुटवाले बसत नसतील तर या लाखोंच्या खर्चाचे फलित काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
एकीकडे पालिका लाखो रुपये खर्च करून फ्रुट मार्केटला रंगरंगोटी करून चकाचक करत आहे, तर दुसरीकडे फ्रुटवाले पालिकेच्या नाकावर टिच्चून रस्त्यावरच व्यवसाय करताना दिसत आहेत. त्यामुळे मार्केट सजले, पण विक्रेते रस्त्यावरच राहिले, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
फ्रुट मार्केट ओसाड राहिले आणि रस्त्यावरील फळविक्री सुरूच राहिली, तर पालिकेने केलेला लाखोंचा खर्च केवळ भिंतींवरचा रंग ठरण्याची शक्यता आहे. सार्वजनिक निधीतून केलेल्या खर्चाचा प्रत्यक्ष उपयोग नागरिकांना आणि बाजारपेठेला झाला पाहिजे, अशी अपेक्षा आहे.
फ्रुटवाल्यांना नियोजित फ्रुट मार्केटमध्ये बसवून रस्ते मोकळे करण्याची जबाबदारी पालिका प्रशासन घेणार का? की रंगरंगोटी करून पुन्हा त्याच समस्येकडे पाठ फिरवणार? असा सवाल आता राजवाड्यातील नागरिक उपस्थित करत आहेत.
फ्रुटवाले मंडईत बसले, रस्ते मोकळे झाले आणि बाजार पुन्हा सुरू झाला तरच लाखोंचा निधी योग्य ठिकाणी खर्च झाला, असे म्हणता येईल!






