सातारा : शहराच्या विकासाच्या गप्पा आणि मोठमोठ्या घोषणांमध्ये नागरिकांच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र शुक्रवार पेठेत पाहायला मिळत आहे. चक्क लोकप्रतिनिधींच्याच प्रभागात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा, दुर्गंधी आणि वाढता डासांचा प्रादुर्भाव यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी नागरिकांना स्वच्छ आणि निरोगी वातावरण देणे ही देखील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची तितकीच मोठी जबाबदारी आहे.
घंटागाडी नियमित येत असल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात कचऱ्याचे ढीग कायम दिसत असल्याने आरोग्य विभागाच्या कामकाजावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सामान्य नागरिकांवर कारवाई करणाऱ्या प्रशासनाने स्वतःच्या प्रभागातील स्वच्छतेकडेही तितक्याच गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
“विकासाच्या नावाने फक्त रस्ते आणि इमारती नव्हे, तर स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. नेत्यांच्या प्रभागातच कचऱ्याचे साम्राज्य असेल, तर ‘स्वच्छ शहर’चा दावा कितपत योग्य?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.






