माण-खटाव मतदारसंघातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले असून भाजपचे नेते शेखर गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या राजकीय प्रवासाबाबत खंत व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून शेखर गोरे यांनी गेल्या १३ वर्षांच्या राजकीय संघर्षाचा उल्लेख करत आपण भाजप नेतृत्वाच्या शब्दावर विश्वास ठेवून पक्षाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला होता, असे म्हटले आहे. त्यांनी माण-खटाव मतदारसंघातील जनतेने मोठ्या बहुमताने भाजपच्या उमेदवाराला निवडून दिल्याचे नमूद केले.
मात्र, त्यानंतर झालेल्या विविध निवडणुकांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संधी न देता विरोधी भूमिका घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माण-खटावच्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी भाजपला ताकद देण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले, मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“आपण शब्द पाळणारे नेते आहात असे ऐकून होतो, पण आज प्रत्यक्षात वेगळाच अनुभव आला,” अशा शब्दांत गोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पत्रकामुळे माण-खटावच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून आगामी स्थानिक व विधानसभा राजकारणावर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






