आषाढी यात्रा २०२६ ची लगबग सुरू झाल्याने पंढरपूर नगरीत प्रशासन, मंदिर समिती आणि विविध शासकीय विभागांची तयारी वेगाने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी राज्याचे ग्रामविकास व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आषाढी यात्रेच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेत सर्व संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. मात्र, बैठकीनंतर त्यांच्या एका कृतीने पालकमंत्री गोरे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून भाविकांमध्ये आणि नागरिकांमध्ये त्याचे मोठे कौतुक होत आहे.
पंढरपूरमध्ये वर्षभर विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या व्हीआयपी भेटी होत असतात. अशा वेळी व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य भाविकांच्या दर्शन व्यवस्थेवर परिणाम होत असल्याची भावना भाविकांमधून वारंवार व्यक्त केली जाते. अनेकदा भाविकांना तासन्तास रांगेत थांबावे लागते, तर व्हीआयपी दर्शन कायमस्वरूपी बंद करण्याची मागणीही वेळोवेळी पुढे येत असते. काही वेळा व्हीआयपी दर्शन तात्पुरते बंद करण्याचे आदेश दिले जात असले, तरी प्रत्यक्षात त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीका देखील होत असते.
अशा परिस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः व्हीआयपी दर्शनाचा आग्रह न धरता सामान्य भाविकांचा विचार करून मुखदर्शनावर समाधान मानल्याने त्यांनी एक सकारात्मक संदेश दिल्याची भावना व्यक्त होत आहे. राज्याचे मंत्री असूनही त्यांनी दर्शनासाठी कोणताही विशेष आग्रह न धरता यात्रेच्या कामांना प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांच्या या कृतीकडे आदर्श म्हणून पाहिले जात आहे.






