विलासपूर येथील इंदिरानगर डॉ. बापूजी साळुंखे नगर व राधिकानगर परिसरात ऐन उन्हाळ्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. दररोज तब्बल बारा-बारा तास वीज उपलब्ध नसल्याने उष्णतेच्या तीव्र लाटेमध्ये नागरिकांचे हाल होत आहेत.
विशेषतः लहान मुले व वृद्ध नागरिकांना याचा मोठा फटका बसत असून, पंख्याविना घरात राहणे कठीण झाले आहे. वाढत्या उकाड्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संग्राम बर्गे व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री अमित बारटक्के यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विजय बोबडे, नितीन भोसले, संजय चव्हाण, गणेश नलवडे, अमित साजणे, प्रदीप चौगुले, गोविंद नलवडे, श्रीकांत बुरुंगले, निशांत तवटे आणि रोहन भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी संग्राम बर्गे यांनी प्रशासनाकडे तातडीने पर्याय शोधण्याची मागणी केली. “ऐन उन्हाळ्यात नागरिकांना अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागणे अत्यंत गंभीर बाब आहे. वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, कार्यकारी अभियंता श्री अमित बारटक्के यांनी या समस्येची दखल घेत “चार दिवसांत या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यात येईल,” असे आश्वासन दिले आहे.






