येथील के.एस.डी. शानभाग व जानकीबाई प्रेमसुख झंवर शाळेतील सुमारे 70 विद्यार्थ्यांना फी न भरल्यामुळे दोन्ही शाळांनी चाचणी परीक्षेस बसू दिले नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान झाले होते. या संदर्भात आज आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सरदार (सागर) भोगांवकर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री बच्चु कडू यांना निवेदन दिले.
त्या अनुषंगाने त्यांनी या दोन्ही शाळांवर तत्काळ कारवाई करुन त्याचा अहवाल सोमवारपर्यंत सादर करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले आहेत.
याबाबत माहिती अशी की, आज दि. 11 जानेवारी रोजी राज्याचे शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री बच्चू कडू आढावा बैठकीच्या निमित्ताने सातार्यात आले होते. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सरदार उर्फ सागर भोगांवकर यांनी सातारा येथील के.एस.डी. शानभाग व जानकीबाई प्रेमसुख झंवर शाळेतील सुमारे 70 विद्यार्थ्यांना फी न भरल्यामुळे दोन्ही शाळांनी चाचणी परीक्षेस बसू दिले नव्हते. यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. या संदर्भात त्यांनी मंत्री बच्चू कडू यांना या दोन्ही शाळांसंदर्भात निवेदन दिले.
भोगांवकर यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सातारा शहरात करंजे तर्फ येथे गेल्या अनेक वर्षांपासून विनाअनुदानित के.एस.डी. शानभाग विद्यालय कार्यरत आहे. या विद्यालयामध्ये सातारा शहर तसेच उपनगरातील हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. ही शाळा विनाअनुदानित असल्यामुळे याठिकाणी विद्यार्थ्यांकडून फी घेवून त्यांना शिकवले जाते. परंतू या घेतल्या जाणार्या फी वर शासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे या विद्यालयामध्ये अव्वाच्या सव्वा फी आकारली जाते. याठिकाणी काही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या पालकांनीही आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातील चांगले शिक्षण मिळावे, या हेतूने याठिकाणी शिक्षणासाठी दाखल केले आहे. परंतू या शाळेतील संचालक हे पैशासाठी हपापलेले आहेत. त्यामुळे वेळेवर फी न भरल्यास के.एस.डी. शानभाग विद्यालयातील व्यवस्थापन त्या फी वर तुघलकी दंड लावून फी वसूल करते. काही पालकांनी वेळेत फी न भरल्याने काल दि. 10 जानेवारी रोजी शालेय चाचणी परिक्षा असतानाही सुमारे पाच ते सहा विद्यार्थ्यांना के.एस.डी. शानभाग विद्यालयाच्या व्यवस्थापनाने परिक्षेला बसून न देता त्यांना मुख्याध्यापकांच्या दालनात दिवसभर बसवून त्यांना परिक्षेपासून वंचित ठेवून त्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे. तसेच याबाबत पालकांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना दिली न गेल्याने याचा विद्यार्थ्यांवर मोठा मानसिक आघात झाला आहे. तसेच दुसर्या प्रकरणात सातार्यातील यादोगोपाळ पेठेत असणार्या जानकीबाई प्रेमसुख झंवर या शाळेतील इयत्ता दुसरी शिकणार्या सुमारे पन्नास ते साठ विद्यार्थ्यांना फी वेळेत न भरल्याने चाचणी परीक्षेस बसू दिलेले नाही. तसेच त्यांना शाळेच्या प्रांगणात दिवसभर उभे करण्यात आले.
दोन्हीही शाळा व्यवस्थापनाने केवळ पैशांसाठी विद्यार्थ्यांचा मुलभूत अधिकार असलेल्या शिक्षणापासून वंचित ठेवून कायद्याची पायमल्ली केलेली आहे. हे निवेदन वाचल्यानंतर मंत्री बच्चू कडू यांनी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर यांना या दोन्ही शाळांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच या संदर्भातील अहवा सोमवार दि. 13 जानेवारी रोजी तत्काळ सादर करण्याच्या सूचना केल्या. जिल्ह्यातील इतर शाळांमधूनही अशाचप्रकारे नियमबाह्य फी वसूली होत असेल तर अशा शाळांवरही कारवाई करण्याचे आदेश मंत्री बच्चू कडू यांनी अधिकार्यांना दिले आहेत.