कास धरणाची उंची वाढवल्याने धरणातील पाण्याचा साठा पूर्वीपेक्षा 5 पटीने वाढला आहे.वाढीव साठयाचा उपयोग होण्यासाठी, केंद्र शासनामार्फत अमृत योजने मधुन रुपये 102.56 कोटीचा, अतिरिक्त नवीन एम.एस.पाईपलाईनचा प्रकल्प मंजूर करुन घेण्यात आला आहे. या नवीन कामाच्या जलवाहीन्या कास धरण परिसरात दाखल झाल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान वापरुन या पाईप्स,जुन्या जलवाहीनीशी समांतर अंथरल्या जाणार आहेत.नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामातील ही प्रगती निश्चितच सातारकरांसाठी सुखद आणि आनंददायी आहे अश्या शब्दात खा श्री छ उदयनराजे भोसले यांनी मत व्यक्त केले आहे.
कास धरण ते सातारा अशी सुमारे 27 किलीमिटर लाबींच्या नवीन अतिरिक्त पाईपलाईनच्या कामासाठी वापरण्यात येणा-या एम.एस.पाईपलाईनचे मोठे ट्रक सातारा-कास परिसरात दाखल झाल्यावर प्रतिक्रीया देताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की,
सातारचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि दूरदर्शी नेतृत्व असलेल्या कै.प्रतापसिंहमहाराज उर्फ दादा महाराज यांनी सन 1975-76 साली, कास ते सातारा अशी बंदिस्त पाईपलाईन टाकण्याचे प्रस्तावित केले होते. आमच्या आणि सातारकरांच्या दुर्देवाने दादामहाराज यांचा अकाली मृत्यू ओढवला, पुढे जवळजवळ 22 -23 वर्षे बंदिस्त पाईपलाईनचे काम झाले नाही. आम्ही कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष झाल्यावर, या कामाला गती दिली आणि महसूल राज्यमंत्री झाल्यावर, उघडया पाटाने येणा-या पाण्याऐवजी सांबरवाडी फिल्टरेशन प्लॅट पर्यंत अधिक स्वच्छ पाणीपुरवठा बंदिस्त पाईपलाईने होवू लागला. बंदिस्त पाईप झाल्यामुळे पाणी मुरुन (परक्युलेश)वाया जाण्याचे प्रमाणही अत्यल्प झाले.
त्यानंतर सातारकरांची तहान भागवणा-या कास धरणाची नुकतीच उंची वाढवण्यात आली. त्यासाठी 95 कोटी रुपये विनियोगात आले आहेत. उंची वाढवल्याने भविष्यातील 35-40 वर्षे सातारकरांना बिनखर्चाचा ग्रॅव्हीटीने मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. उंची वाढवल्याने, पूर्वीची 0.1 टिएमसी पाण्याची क्षमता असणारे धरण आज रोजी 0.5 टिएमसी क्षमतेचे झाले आहे. पाणी साठा सुमारे 5 पटीने वाढला आहे. या वाढीव पाणीसाठयाचे सुयोग्य वितरणासाठी पूर्वीच्या बंदिस्त पाईपलाईनला समांतर नवीन अतिरिक्त एम.एस.पाईपलाईन नुकतीच केंद्रशासनाकडून आम्ही मंजूर करुन घेतली आहे. त्यानुसार नवीन जलवाहिनीच्या कामास आता सुरुवात होत आहे. नवीन पाईप लाईन सरासरी 800 एमएम व्यासाची आहे. नवीन पाईपलाईनचा अंदाजपत्रकीय खर्च सुमारे 102 कोटी 56 लाख इतका आहे. यामध्ये वेगवेगळया व्यासाची सुमारे 23 किलोमिटर लांबीची पाईपलाईन, 10 लक्ष लिटर क्षमतेची पॉवरहाऊस येथे पाण्याची साठवण टाकी, 16 एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र, 1 मेगावॅट क्षमतेचे जलविदयुत केंद्र इत्यादी विविध कामांचा समावेश आहे. सध्या 6 एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे.नवीन पाईपलाईन झाल्यावर कास धरणातून एकूण 35 एमएलडी पाणी सातारकरांना मिळणार आहे. शहापूर योजना नजीकच्या काळात बंद करुन, त्या योजनेला कासचेच पाणी जोडले जाईल. तसेच कण्हेर उद्भव योजनेला देखिल कासचेच पाणी जोडण्यात येणार आहे.
कास धरणाची उंची वाढवल्याने, कास धरणापासून पुढे जाणा-या रस्त्याचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. या रस्त्यावर ग्रामस्थांच्या मागणीनुसार सुमारे 2 कोटी 28 लाख खर्च करुन, पूलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.तसेच त्याठिकाणच्या रस्त्यावर 5 कोटी रुपये विनियोगात आणताना डोंगर खादून, करण्यात येणारे रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.तसेच घाटाईकडून जाणा-या पर्यायी रस्त्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे कास ग्रामस्थ किंवा त्यापुढील पश्चिमेकडील गावांचा संपर्क तुटणार नाही याची दक्षता घेतलेली आहे.कास धरणातुन सातारा शहराबरोबरच सुमारे 24 जलवाहीनीच्या लगतच्या गावांना पिण्याचे पाणी पुरवण्यात आले आहे.कासच्या पाण्यावर सुमारे 1 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या जीवन जगत आहे.त्यादृष्टीने कास धरण हे सातारकरांचे जीवनदायी धरण ठरले आहे.
कास ते सातारा नवीन अतिरिक्त पाईपलाईनचे कामसातारकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आणि मैलाचा दगड ठरणारे काम आहे. हे महत्वपूर्ण काम पूर्णत्वाकडे जात असल्याने, पुढील सुमारे 40 वर्षांची सातारकरांची चिंता मिटली आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.