पवनचक्क्यांच्या नोंदी नसल्याने कोट्यवधीचा महसूल नाही वसूल
–ग्रामपंचायत विभागाचा हलगर्जीपणा तर अनेक पवनचक्क्या स्क्रॅप झाल्याने महसूल बुडाला
– अधिकारी, कर्मचाऱ्यांची होते वरकमाई
सातारा-प्रतिनिधी
जिल्ह्यात पाटण, सातारा,माण, खटाव, कोरेगाव तालुक्यात १९९८ नंतर मोठ्या प्रमाणात पवनचक्क्या उभारल्या गेल्या. देशभरातील बडे उद्योगपती, व्यवसायिक, राजकीय नेत्यांच्या सदरच्या पवनचक्क्या असून संबंधित ग्रामपंचायतीकडे त्यांच्या नोंदणी न केल्याने मालमत्ता कर आकारणी केली जात नाही. अधिकारी, कर्मचाऱ्यांना पवनचक्क्या कंपनी, मालकांकडून मलीदा मिळत असल्याची चर्चा असून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत तक्रार दाखल करुनही जिल्हा परिषदेकडून माहिती दिली जात नसल्याने याविरोधात नव्याने तक्रार आणि न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सांगितले.
जिल्ह्यात असलेल्या सर्व पवनचक्क्या या मातब्बर मंडळाशी संबंधित असून २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून ग्रामपंचायतीकडे यांच्या नमुना नंबर ८ आणि ९ वर नोंदणी केल्या गेल्या नाहीत.याची ना गटविकास अधिकारी ना उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे पवनचक्क्या हद्दीत असून ग्रामपंचायतीकडे नमुना ८ वर नोद नसल्याने ना कर आकारणी ना वसुली मिळत नाही. या कंपनी, मालकांनी लाखो रुपयांचा कर भरण्यापेक्षा वर्षानुवर्षे ग्रामस्तरावरील कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळेवर मलिदा दिला जात असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर याबाबत माहिती अधिकार कर्ज करून हि माहिती दिली जात नसल्याने संशय बळावला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून १५ वर्षाहून अधिक काळ लोटला असलेल्या अनेक पवनचक्क्या स्क्रॅप केल्या गेल्या, सध्या ही सुरू आहे. नोंदणी नसल्याने त्यांच्याकडून एक रुपयाही ग्रामपंचायतीला त्यामुळे कोट्यवधीचा निधी मिळाला नाही, तरीही पंचायत समिती, जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केले.
जिल्ह्यात महावितरण कडून मिळालेल्या माहितीनुसार तब्बल ८६४ पवनचक्क्या जिल्ह्यात सुरू आहेत.हिच माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीच्या विभागाकडून मिळाली नाही. त्यामुळे “डाल में कुछ काला है,”हा संशय बळावला आहे.
नोंदणी न करणाऱ्या संबंधित कर
याविरोधात नव्याने वरिष्ठांकडे तक्रार आणि न्यायालयात याचिका दाखल करुन संबंध सर्व नोंदणी करून आजपर्यंतचा दंडात्मक कारवाई करत कराची वसुली करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले.
चौकट-१
एका इशाऱ्यातचं २ कोटी जमा
माण तालुक्यातील शिरताव आणि वरकुटे मलवडी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत सौर ऊर्जा प्रकल्प असलेल्या आवादा सौर ऊर्जा प्रकल्प प्रा.लि. या कंपन्यांनी काही वर्षें मालमत्ता कर थकवला होता. त्याविरोधात तक्रार दाखल करुन आंदोलनाचा इशारा दिला होता. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेला जे जमले नाही ते फक्त आंदोलनाचा इशारा देताच संबंधित कंपनीनी तत्काळ दोन्ही ग्रामपंचायतीकडे जवळपास २ कोटी रुपये कर जमा केला होता. अधिकारी, कर्मचाऱ्यांना जे दहा वर्षे जमले नाही ते फक्त एक इशारा देताच संबंधित कंपनीनी शिरताव ग्रामपंचायतीकडे ४६ लाखांहून अधिक आणि वरकुटे मलवडी ग्रामपंचायतीकडे १ कोटी ९ लाखांहून अधिक थकीत कर भरला होता.तसाच आता स्क्रॅप झालेल्या आणि सध्या उभ्या असलेल्या सर्व पवनचक्क्यांंचा प्रत्येक वर्षीचा नियमांप्रमाणे कर दंडात्मक रक्कमेसह ग्रामपंचायतीला जमा होई पर्यंत हा लढा लढणार असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले.
चौकट -२
२,३,५ चा डाव करणार ओपन
जिल्ह्यात काही वर्षांपासून ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांकडून पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील काही अधिकारी दिवाळी,मार्च एंड वेळी २,३,५ हजार आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत रोखीत गोळा करतात. त्यासाठी संघटनेचे पदाधिकारी, कार्यालयातील कर्मचारी, विस्तार अधिकाऱ्यांमार्फत हा वर्षातून एक दोन वेळा हि ओवाळणी गोळा केली जाते. बदलीसाठी सुध्दा अधिकारी जड पाकिट घेतात.याचे अनेक कॉल रेकॉर्ड, व्हिडिओ, अन्य पुराव्यानिशी लवकरच माध्यमांसमोर मांडणार आहे. २,३,५ हजार कोणी कोणी गोळा केले आहेत. याचा पोलखोल झाल्यावर हा डाव ओपन झाल्यावर संबंधित अधिकाऱ्यांच्या ईडीकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले.