महाविकास आघाडी सरकारने आश्वी पोलिस ठाण्यात समाविष्ठ असलेली 7 गावे राजकीय हेतूने संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात वर्ग करण्याचा केलेला निर्णय महायुती सरकारने रद्द केला आहे.
ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेवून ही सर्व गावे पुन्हा आश्वी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यास हिरवा कंदिल दिला आहे. महायुती सरकारच्या निर्णयामुळे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना मोठा दणका राजकीय बसला आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्ठ असलेल्या संगमनेर तालुक्यातील गावांसाठी ग्रामस्थांच्याच मागणीनुसार 9 सप्टेंबर 2013 रोजी आश्वी येथे स्वतंत्र पोलिस ठाणे मंजुर करुन, त्याची कार्यवाही सुरु झाली. स्वतंत्र्य पोलिस ठाणे नसल्यामुळे या भागातील नागरीकांना संगमनेर तालुका पोलिस ठाण्यातच कामासाठी जावे लागत होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने आश्वी येथे स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण झाल्याने या भागातील सर्वच गावांना मोठा दिलासा मिळाला आणि गुन्हेगारी कमी होण्यासही मदत झाली.