Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City जिल्ह्यातील पर्यटनासाठी 381 कोटीचा निधी मंजूर

जिल्ह्यातील पर्यटनासाठी 381 कोटीचा निधी मंजूर

355
Adv

सातारा जिल्हा प्रशासनाने आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींना विचारात घेवून तयार केलेल्या सातारा जिल्हा पश्चिमघाट एकात्मिक धार्मिक, ऐतिहासिक, ईको टुरिझम मंडळांतर्गत तयार केलेल्या 381 कोटी 62 लाख रुपयांच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखडयास मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या सर्वोच्च कमिटीने बैठकीत मान्यता दिली आहे.

यामध्ये क्षेत्र महाबळेश्वर मंदिर विकासाकरीता 187 कोटी 42 लाख, प्रतापगड किल्ल्याच्या जतन, संवर्धन व विकासाकरीता रुपये 127 कोटी 15 लाख, सहयाद्री व्याघ्र राखिव प्रकल्पासाठी रुपये 44 कोटी 99 लाख तर कोयना जलपर्यटनासाठी रुपये 22 कोटी 06 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा समावेश आहे.

सातारा जिल्हा पश्चिमघाट एकात्मिक धार्मिक, ऐतिहासिक, पर्यावरण मंडळाने सातारा जिल्यातील धार्मिक स्थळांसह ऐतिहासिक आणि इको टुरिझम क्षेत्रांच्या विकासाचा आराखडा तयार करुन शासनाला सादर केला होता. याविषयी शासनाने नियुक्त केलेल्या सर्वोच्य समितीची बैठक आज दि. 22 रोजी सहयाद्री अतिथीगृहावर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली होती. या बैठकीत विविध विकास कामांसाठी एकूण रुपये 381 कोटी 62 लाखांच्या कामास मंजूरी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणा-या थंड हवेच्या महाबळेश्वर लगत असलेल्य क्षेत्र महाबळेश्वरला अनेक भाविक भेट देत असतात. याच ठिकाणी पंच नद्यांचे पवित्र उगम स्थान आहे. तसेच इतिहासाचा अनमोल ठेवा असलेले आणि महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा स्वाभिमान जागृत ठेवणारे ठिकाण म्हणजेच किल्ले प्रतापगडाचा इतिहासाच्या पाऊलखुणा जतन करीत विकास होणे गरजेचे होते. आता शिवप्रभुंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले प्रतापगडाचा विकास पूर्वीचे वैभव जतन करीत होणार आहे. कोयना जलाशयामध्ये जलपर्यटनामुळे कोयनाधरण तसेच पं.जवाहरलाल नेहरु उद्यान आणि येथील निसर्ग डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना जलपर्यटनाची सुखद सुविधा निर्माण होणार आहे. तसेच सहयाद्री व्याघ राखिव क्षेत्राचा पूरक विकास साधताना, पर्यटकांना अधिकाधिक सुविधा मिळणार आहेत.

या विकासकामांबरोबरच स्थानिकांना रोजगाराची अधिकची संधी उपलब्ध होणार आहे. या ठिकाणचा सुनियोजित विकास होण्याबाबत आम्ही तसेच अन्य लोकप्रतिनिधी, सातारचे पालकमंत्री आग्रही होतो. त्यानुसार सातारचे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी आणि त्यांच्या अधिका-यांनी पश्चिमघाट एकात्मिक धार्मिक, ऐतिहासिक, ईको टुरिझम आराखडा तयार करुन शासनाकडे सादर केला होता. मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्य समितीने याकामी आजच्या बैठकीत या चार महत्वपूर्ण विषयांना मान्यता दिल्याने,
एकाच बैठकीत सातारा जिल्हयासाठी 381 कोटी 62 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या आराखड्यास सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आम्ही विशेष अभिनंदन करतो आणि सातारकर जिल्हावासियांच्या वतीने आभारही व्यक्त करतो.

Adv