सांगलीचे शिवसेना आमदार सुहास बाबर यांनी साताऱ्यात पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत सातारा–सांगली विधानपरिषद निवडणुकीसह स्थानिक राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत झालेल्या गोंधळानंतर शिवसेना पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आल्याचे संकेत या भेटीतून मिळत आहेत. महायुतीतील समन्वय, नाराजी आणि आगामी राजकीय समीकरणांवरही खलबते झाल्याची चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने भाजपाच्या रणनीतीसमोर नवे प्रश्न उभे राहिले आहेत. शिवसेनेने स्वतंत्र भूमिका घेत भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे का, याबाबत राजकीय निरीक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
आगामी काही दिवसांत सातारा–सांगलीच्या राजकारणात नवे ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या भेटीचे पडसाद महायुतीच्या राजकारणात उमटण्याची चिन्हे आहे
दोन्ही नेत्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांची मतांची गणिते, महायुतीतील समन्वय आणि आगामी निवडणुकीची रणनीती यावर सविस्तर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीमुळे सातारा–सांगलीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.






