सातारा आणि औंध गॅझेट प्रकरणावर मराठा समाजासाठी राज्यभर आवाज उठवणारे अनेक तथाकथित नेते आज मात्र शांत का आहेत, असा सवाल आता सर्वसामान्य मराठा बांधवांमधून उपस्थित होत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सातारा संस्थान आणि औंध गॅझेट संदर्भातील जीआरची मागणी आक्रमकपणे लावून धरली असताना, जिल्ह्यातील अनेक मोर्चेकरू नेत्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
जरांगे पाटील यांच्या दौऱ्यावेळी व्यासपीठावर पुढे पुढे करणारे, फोटो आणि घोषणांमध्ये आघाडीवर दिसणारे नेते आता या महत्त्वाच्या मुद्द्यावर गप्प का आहेत? हा प्रश्न गोरगरीब मराठा समाजाला पडला आहे. सातारा गॅझेट लागू करण्यासाठी आंदोलनाची भाषा करणारे आज मौन बाळगत असल्याने हे आंदोलन समाजासाठी होते की केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी, अशी चर्चा राजधानी साताऱ्यात रंगू लागली आहे.
मराठा आरक्षणाच्या लढ्यात सातारा आणि औंध गॅझेट हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जात असताना, याच विषयावर स्थानिक नेतृत्वाची शांतता अनेक प्रश्न निर्माण करत आहे. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरणारे नेते आता नेमके कोणाच्या दबावाखाली आहेत, याचे उत्तर मराठा समाज मागत आहे
“राजधानीतील मराठे गप्प, नेते गप्प आणि प्रश्न मात्र कायम,” अशी भावना आता सर्वसामान्य तरुणांमध्ये व्यक्त होत असून, समाजाच्या प्रश्नांवर निवडक भूमिका घेणाऱ्या नेतृत्वावर टीकेची झोड उठत आहे. जरांगे पाटील सातारा गॅझेट आणि संस्थानांच्या जीआरसाठी लढत असताना, साताऱ्यातील स्वयंघोषित मराठा नेत्यांनीही आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Home Latest News Politics|Satara District सातारा व औंध गॅझेट प्रकरणी राजधानीतील मराठी नेते व मोर्चाचे मुखिया गप्प...






