माणदेशी फौंडेशन व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त सहकार्याने ग्रामीण भागातील पंधरा उद्योजिकांना प्रतिनिधिक तत्वावर कर्जवाटप करण्यात आले . या उपक्रमाची माहिती माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्ष चेतना सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत दिली .
या उपक्रमाचे उद्घाटन बुधवारी दुपारी साडेतीन वाजता एका छोटेखानी कार्यक्रमात झाले . स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक दीपककुमार लल्ला, व्यवस्थापक संजय श्रीवास्तव, सहाय्यक व्यवस्थापक विनोदकुमार व संदीप मून व माणदेशी बँकेच्या प्रशासकीय अधिकारी वनिता शिंदे यावेळी उपस्थित होते .
चेतना सिन्हा पुढे म्हणाल्या लॉक डाऊनमुळे सर्वच उद्योग आर्थिक अडचणीतून जात आहेत . ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कमी व्याजदरात कर्ज देण्यासाठी माणदेशी फौंडेशन व स्टेट बँक ऑफ इंडिया एकत्र आले आहेत . महिलांना कर्ज कुठून कसे घ्यावे, त्याचा व्याजदर पाहणे इं गोष्टी लक्षात घेऊन महिलांना माणदेशी बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी एक उपक्रम सुरू केला आहे . माणदेशी फौंडेशनने तयार केलेल्या क्रेडिट रेटिंग टूलचा स्टेट बँकेच्या कर्ज वितरण प्रणालीत समावेश केला आहे . यामुळे अर्जदार महिला किती रकमेपर्यंत कर्जाला पात्र आहेत हे समजते . हा उपक्रम तळागाळातील लोकापर्यंत विकासाची धारा कशी पोहचवितो याचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे सिन्हा यांनी सांगितले . सातारा व सोलापूर जिल्ह्यातील 39 महिलांच्या कर्जाचे अर्ज स्टेट बँकेला सादर करण्यात आले . यामध्ये लोणंद दहिवडी सातारा येथील 23 महिलांचा यामध्ये समावेश आहे . अनिता खरात ( दहिवडी ) मनीषा नागावकर ( फलटण ) शुभांगी मुसळे ( लोणंद ) यांनी त्यांच्या व्यवसायासाठी अर्ज केले आहेत . अशा विविध व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध असून बँक आपल्या दारी या माध्यमातून गरजू उद्योजिकांपर्यत हा प्रयत्न असल्याचे माणदेशी फाउंडेशनच्या प्रशासकीय अधिकारी वनिता शिंदे यांनी सांगितले .वंदना भोसले अपर्णा सावंत, सोनाली पवार इं माणदेशी परिवाराच्या सदस्या उपस्थित होत्या .