पन्नास कोटीच्या काँक्रिट रस्त्यांसाठी राजकीय इच्छाशकती पणाला उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांनी मरगळं झटकण्याची गरज

127
Adv

सत्तेच्या साठमारीत सातारा जिल्हयातील काही नेत्यांची भाजप प्रवेशाची वेळ चुकल्याने त्याचा परिणाम विकास कामांवर झाला आहे . तत्कालीन फडणवीस शासनाने सातारा शहरातील काँक्रिट रस्त्यांसाठी 50 कोटी रूपयांची घोषणा केली होती . त्या निधीसाठी साताऱ्यात माजी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे यांना राजकीय दृष्टीने कंबर कसावी लागणार आहे .

महाराष्ट्रात भाजपचा सत्ता स्थापनेचा प्रयोग फसल्याने भाजपमध्ये आयारामांची पुरती कोंडी झाली आहे . सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्र राजे यांनी आमदारकीचा झेंडा रोवला तरी मतदार संघाच्या विकासासाठी सत्ता हवी म्हणून त्यांनी भाजप प्रवेश केला मात्र सत्तासोपानात महाशिवआघाडी यशस्वी झाल्याने आमदारांची साताऱ्यात कोंडी झाली आहे .
माजी खासदार उदयनराजे भोसले यांचा सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूकीत झालेला पराभव भाजपच्या भलताच जिव्हारी लागला आहे . उदयनराजे यांच्या राजकीय पुर्नवसनाचा शब्द मिळाला असला तरी मोदी शहा या जोडगोळीला पवारांचे धक्कातंत्र अद्याप पचलेले नाही त्यामुळे देश व प्रदेश पातळीच्या संघटनात्मक बांधणी अजूनही पुढे सरकलेल्या नाहीत .
साताऱ्यात होमग्राउंडवर उदयनराजे व शिवेंद्र राजे यांच्या राजकीय संयमाची व मुत्सद्देगिरीची खरी परीक्षा आता असणार आहे . पहिल्या टप्प्यात सातारा शहराची हद्दवाढ व शहरातील कॉंक्रिट रस्त्यांसाठी पन्नास कोटी रुपयांच्या निधीची घोषणा साताऱ्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती . सातारा पालिकेने शहरातील तेरा रस्त्यांचा प्रकल्प आराखडा अंतिम टप्प्यात आणला आहे त्यामध्ये अनेक तांत्रिक मंजूरीचे टप्पे जरी असले तरी पन्नास कोटीचा निधी व सातारा शहर हद्दवाढ या दोन महत्वाच्या गोष्टीसाठी दोन्ही राजांनी प्रशासकीय व राजकीय कसबं पणाला लावावे अशी सातारकरांची अपेक्षा आहे .

(चौकट)
उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या राजकारणात नेहमीच बेरजेचे राजकारण केल्याने काँग्रेस राष्ट्रवादी सेना या सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहे .आमदार शिवेंद्र राजे भोसले यांचीही प्रशासकीय कार्यशैली व राजकीय स्नेहबंध महाराष्ट्राला ठाऊक आहेत . दोन्ही बंधूची लढत भाजपच्या निमित्ताने थोरल्या पवारांच्या विरोधात झाली तरी पवारांचे साताऱ्यातील राजघराण्याविषयी ममत्वं कायम आहे . त्याचा साताऱ्याच्या विकास कामावर परिणाम होईल असा राजकीय आकसं पवारांच्या प्रगल्भं राजकारणाने कधीच ठेवलेला नाही . मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुध्दा सूडाचे राजकारण करणार नाही याचे संकेत दिलेले आहेत . साताऱ्याचे राजघराणे त्यांचा महाराष्ट्रात नव्हे तर देशपातळीवरील दबदबा याचे पुरेपूर भानं मुख्यमंत्र्यांना आहे . पश्चिम महाराष्ट्राच्या संदर्भाने निर्णय होताना किंगमेकर शरद पवार यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे . त्यामुळे दोन्ही नेत्यांनी राजकीय मुत्सद्देगिरीने विकास कामे व निधी पदरात पाडून घ्यावेत ही सध्या सातारा शहराच्या विकासाची गरज आहे .

Adv