Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Satara District जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटन स्थळे 5 ऑगस्टपर्यंत बंद

जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटन स्थळे 5 ऑगस्टपर्यंत बंद

362
Adv

भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी 1 ते 5 ऑगस्ट 2024 अखेर सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील- लिंगमळा व भिलार धबधबा तसेच सर्व पर्यटनाचे पॉइंट, पाटण तालुक्यातील – ओझर्डे (नवजा) व सडावाघापूर धबधबा, सातारा तालुक्यातील- ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबे व कास तलाव तसेच जावली तालुक्यातील- ऐकीव या धबधब्यांच्या ठिकाणी विशेषतः मान्सून कालावधीत वर्षाविहारासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये. जिवीत व वित्तहानी होऊ नये या करिता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा जिल्ह्यातील वरील धबधबे तसेच जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी तात्पुरते स्वरुपात बंद ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जितेंद्र डुडी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये सातारा जिल्हयातील सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

सदर धबधब्यांच्या ठिकाणी आणि जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पोलीस विभागाने सातारा जिल्ह्यातील वरील धबधब्यांच्या/पर्यटन स्थळांच्या अतिवृष्टीच्या कालावधीत पर्यटकांना दि.02/08/2024 ते 04/08/2024 अखेर जाणेस तात्पुरत्या स्वरुपात बंदी घालणेत येत आहे.

ठिकाणी जाणारे मार्ग / रस्ते बंद करावेत. पोलीस विभाग व संबंधीत गावातील वन हक्क समितीने धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक जाणार नाहीत तसेच सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये याबाबत दक्षता घ्यावी. पर्यटन स्थळी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त नेमण्यात यावा व आवश्यक त्या ठिकाणी पेट्रोलिंग करावे. पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यकतेनुसार होमगार्ड विभागाची मदत घेण्यात यावी. आवश्यकता भासलेस नियमांचा भंग करणा-या विरुध्द आवश्यक ती कठोर कारवाई करावी. सदरकामी मोठया प्रमाणावर जाहिर प्रसिध्दी देणेत यावी. संबंधीत कार्यकारी दंडाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांनी आपले स्तरावरुन स्वतंत्र प्रतिबंधात्मक आदेश पारित करुन त्याची अंमलबजावणी करावी. पोलीस विभाग, महसूल विभाग, वन विभाग, ग्रामविकास विभाग व नगरपालिका विभागांनी संयुक्त रित्या उक्त आदेशाची अमंलबजावणी तात्काळ करावी. असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

Adv