आजच्या राजकारणात सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व लाभलेले नेते बोटावर मोजण्याएवढेच पाहायला मिळतात. यामध्ये आवर्जून नाव घ्यावे असे नेतृत्व म्हणजे नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले होय! राजघराण्यातील व्यक्ती असूनही कोणताही डामडौल न मिरवत सर्वसामान्यांमध्ये तन आणि मनाने एकरूप होणारे नेते अशी ख्याती ना. शिवेंद्रसिंहराजेंची आहे. सर्वांशी मिळून मिसळून, आपलेपणाने वागणारे, सर्वांच्या सुखदुःखात समरस होणारे, सर्वांना सोबत घेऊन जाणारे, सर्वांच्या अडीअडचणी सोडवणारे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले नेहमीच ‘द ग्रेट लीडर’ म्हणून ओळखले जातात. ३० मार्च १९७३ रोजी जन्मलेल्या ना. शिवेंद्रसिंहराजेंनी आजपर्यंत विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत राज्याच्या समाजकारण आणि राजकारणात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.
छत्रपति शिवाजी महाराज यांचा वारसा व राजघराण्याची उज्वल परंपरा जोपासत, स्व. भाऊसाहेब महाराज यांच्याकडून समाजकारणाचे बाळकडू मिळालेल्या ना. शिवेंद्रसिंहराजेंनी आधुनिक शेती व नवनवीन तंत्रज्ञान अवगत करण्यामध्ये विशेष लक्ष देऊन विविध योजनांचा पाठपुरावा करून शेतकरी बंधूंना अधिकाधिक लाभ व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सातारा व जावली तालुक्यातील तरूण वर्गाला संघटीत करून सामाजिक कार्यात अग्रेसर राहण्यात त्यांना नेहमीच आवड राहिली आहे. सातारा शहर, सातारा- जावली तालुक्यातील विविध सार्वजनिक विकास कामासाठी सातत्याने प्रयत्नशील, गोरगरीब व दीन दलितांच्या समस्या निवारणासाठी तत्परतेने ते सदैव कार्यरत असतात.
स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना मर्यादित, शाहूनगर शेंद्रे या प्रतिथयश सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी मे १९९४ मध्ये निवड होऊन दहा वर्षे ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. कारखान्याच्या आधुनिकीकरणासह उत्कृष्ट कार्यक्षमता राखून आणि राज्य व देश पातळीवरील २१ कार्यक्षमता पारितोषिके मिळवून सन १९८३-८४ पासून आजपर्यंत गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. उत्कृष्ट तांत्रिक कार्यश्वमतेनेयुक्त डिस्टीलरी सन १९९१ पासून उभारॅली. गेल्या काही वर्षांपासून इथेनॉल प्रकल्प उभारून मुल्यवर्धनासाठी विशेष प्रयत्न. सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून सातारा शहराला वीज पुरवठा करण्याचे मोलाचे कार्य केले जात आहे. ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या सक्षम नेतृत्वाखाली कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला असून उसपुरवठादार शेतकऱ्यांना उच्चतम दर दिला जात आहे.
अजिंक्य उद्योग समुहाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांच्या उसाला व शेतमालास योग्य दर देण्यासाठी अथक प्रयत्ल करून सातारा तालुक्यातील कृषी औद्योगिक विकास वृद्धिंगत करण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान त्यांनी दिले आहे. उद्योग समुहांतर्गत अनेकविध सहकारी संस्थांचे जाळे तालुक्यामध्ये निर्माण झाले असून त्यामध्ये १८ उपसा जलसिंचन योजना यशस्वीपणे कार्यान्वित आहेत. अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीची सक्षमपणे उभारणी करून सुताची देशासह परदेशी बाजारपेठेत निर्यात केली जात आहे. अजिंक्यतारा सह. कृषि औ. ऊस तोडणी व वाहतूक संस्था, अजिंक्यतारा फळे-फुले व भाजीपाला खरेदी-विकी सहकारी संस्था मर्या., एक नाविण्यपूर्ण उच्च तंत्रज्ञानयुक्त शेती उत्पादक संस्था ज्यामध्ये शेतकरीबंधूंना ग्रीन/पॉली हाऊस शेती उत्पादनास प्रोत्साहन देवून त्यांच्या मालास किफायतशीर दर देण्यास प्राधान्य इत्यादी सहकारी संस्थांची उभारणी केली.
अजिंक्य उद्योग समुहाच्या माध्यमातून शेतकरी सभासदांच्या कुटूंबातील हजारो युवकांना नोक-या उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम केले आहे. एमआयडीसी मधील लहान मोठ्या उद्योगांच्या विविध प्रश्नांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करून उद्योग व उद्योजकांना पाठबळ देण्याचे, बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी नवनवीन उद्योग, कंपन्या साताऱ्यात आणण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून सातारा व जावली तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, दळणवळण आदी मुलभूत सोयी-सुविधांसाठी शासनाच्या माध्यमातून हजरो कोटी रूपयांचा निधी आजवर उपलब्ध करून दिला आहे.
शालेय जीवनापासून विविध समाजकार्याबरोबरच राजकिय कार्याची विशेष आवड, मूदूभाषी व सर्वसामान्याबाबतची तळमळ आणि अंगीकृत गुण-कर्तृत्वाच्या जोरावर तालुक्यातील युवावर्गाशी अत्यंत सौहार्दपूर्ण व जिव्हाळयाचे नाते निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. युवा वर्गाबरोबरच आरोग्यदायी समाजनिर्मितीचा ध्यास घेऊन मॅरेथॉन तसेच सायकलिंग स्पर्धांच्या आयोजनाबरोबरच गेली १० वर्षे देशभरातील मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा विकमी वेळेत पूर्ण करतात. माऊंट एव्हरेस्ट शिखरावर त्यांनी सपत्नीक यशस्वी चढाई केली असून १४,००० फूटांवरून स्काय डायव्हींग करण्याचा आनंदही लुटला आहे. स्वतः एक उत्तम खेळाडू असलेल्या ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शन आणि पाठबळातून विविध क्रीडा स्पर्धा सातत्याने आयोजित केल्या जातात.
महाराष्ट्र विधानसभेच्या ऑक्टोबर २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये सातारा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले हे प्रचंड बहुमतांनी निवडून आले आहेत. नंतर सातारा विधानसभा मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर ऑक्टोबर २००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सातारा-जावली मतदारसंघातून संपूर्ण महाराष्टात दुस-या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत. ऑक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षातर्फे सातारा-जावली तालुक्यातून ४७,८१३ एवढया विक्रमी मताधिक्याने निवडून आले आहेत. देशात सहकार क्षेत्रात अग्रणी असणा-या व सातारा जिल्हयाची अर्थवाहिनी म्हणून नांवलौकीक असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून सलग २० वर्षे उत्कृष्ट कामकाज करीत आहेत. मे २०१५ मध्ये झालेल्या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवड होऊन त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद भूषविले आहे. अध्यक्षपदाच्या काळात जिल्हा बँकेच्या नांवलौकीकात अधिकाधिक भर टाकण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सध्याही ते जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आपले योगदान देत आहेत.
दिनांक ३० जुलै २०१९ रोजी त्यांनी जनतेच्या हितासाठी व मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक १ ऑगस्ट २०१९ रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे सातारा-जावली तालुक्यातून ४३,४२४ एवढया विक्रमी मताधिक्याने निवडून आले. २०१९ ते २०२४ या कालावधीत सातारा शहर व सातारा-जावली मतदार संघात त्यांच्या माध्यमातून हजारो कोटींची विकास कामे मार्गी लागली आहेत. नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत सातारा जावली मतदार संघातून भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. या निवडणूकीत त्यांनी १ लाख ४२ हजार एवढया विक्रमी मताधिक्यानी विजय मिळवून महाराष्ट्रात दुसण्या कमांकाचे मताधिक्य मिळविण्याचा विक्रम केला आहे. सध्या ते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (कॅबिनेट मंत्री) व लातुर जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून राज्याच्या विकासात्मक वाटचालीत मोलाची भर पडत आहे.
(श्री. अमरसिंह मोकाशी, )