
अजित जगताप -सातारा दि: शेतकऱ्यांची बँक असा नावलौकिक असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तत्त्वप्रणाली आदर्शवत होती. आता ती इतिहास जमा झाली असून त्याला अनेक कारणे आहेत. नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या वेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक यांना धक्काबुक्की झाली. नवलाईची गोष्ट म्हणजे याबाबत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व संचालक व कर्मचारी अधिकाऱ्यांनी मौन धारण केले आहे. जे संचालकांचे होऊ शकत नाहीत ते काय शेतकऱ्यांचे होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांना सुलभ कर्जपुरवठा करण्यासाठी स्थापन झाली. या बँकेला यंदाच्या वर्षी मध्ये १९७ कोटी ८८ लाखांचा नफा झाला असून, ३१९ शाखांच्या नेटवर्कसह ती कार्यरत आहे . जिल्ह्यात बँकेच्या ३१९ शाखा व ९६० सोसायट्यांच्या माध्यमातून विस्तृत नेटवर्क आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जडणघडणीमध्ये संचालक व पदाधिकाऱ्यांचा सिंहचा वाटा आहे. असे असताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून व जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड नाट्य मध्ये सत्ताधारी महायुतीतील भाजप सरकारने धुडगूस घातला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष व खासदार नितीनकाका पाटील , राज्याचे मंत्री व ज्येष्ठ संचालक मकरंदआबा पाटील यांना धक्काबुक्की तर व्हॉइस चेअरमन असलेल्या अनिल देसाई यांच्यावर तर अपहरण आणि खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून त्यांना तुरुंगात डांबले. हा सर्व प्रकार हा सत्तेसाठी केल्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळात याबाबत पाऊण तास चर्चा झाली. सर्व महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांनी त्याची नोंद घेतली. पण, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासात अशाप्रकारे कधीही संचालक मंडळाने मौन धारण केले नव्हते. शंभर पुरस्कार प्राप्त केलेल्या जिल्हा बँकेला आपलं मत व्यक्त करण्याचाही अधिकार राहिलेला नाही. विशेष बाब म्हणजे २० संचालकांपैकी राजकारणात प्रभाव असलेले श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,रामराजे नाईक निंबाळकर, बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, दत्तात्रय ढमाळ, सत्यजित पाटणकर, प्रदीप विधाते, सुनील खत्री, रामभाऊ लेंभे, सुरेश सावंत, लहुराज जाधव, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, ज्ञानेश्वर रांजणे, शेखर गोरे, राजेंद्र राजपुरे यांच्यासारखे संचालक जिल्हा बँकेत आहेत.
सातारा जिल्हा परिषद व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे घडलेल्या घटनेबाबत जिल्हा बँकेमार्फत भूमिका स्पष्ट होणे गरजेचे आहे. परंतु याबाबत संचालकांनी मौन धारण केले आहे. जे जिल्हा बँकेच्या संचालकांचे होऊ शकत नाहीत. त्यांच्या अडीअडचणीला मदतीला धावून जात नाहीत. ते मौनी बाबा सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काय भले करणार? असा आता मार्मिक प्रश्न सातारा जिल्ह्यातील शेतकरी बांधव व जिल्हा परिषदेचे संबंधित विचारू लागलेले आहेत. जर संचालक जर मौन धारण करत असतील. तर शंभर पुरस्कार काय चुलीत घालायचे आहेत का? सध्या गॅस टंचाईमुळे चुलीला महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे ज्यांना आपलं मत नोंदवायचं नाही. त्यांना मिळालेला पुरस्कार चुलीत घालण्या सारखाच आहे. अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
दरम्यान, याबाबत जिल्हा बँकेचे काही संचालक प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत असल्याने याची आता सभासद सुद्धा नोंद घेतील असे काही सभासदांनी स्पष्ट केले आहे.





