कासच्या धरणाच्या अंतिम टप्प्याचा उदयनराजे यांनी फोडला नारळ दादा महाराजांचे स्वप्न साकारले – उदयनराजे यांची भावनिक प्रतिक्रिया

300
Adv

कास धरण उंची वाढवण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. पावसाळयात अंतिम टप्यातील काम बंद ठेवण्यात आलेल्या तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या टप्प्याच्या कामाचा आज शुभारंभ होत आहे. कास धरण उंची वाढवण्याची संकल्पना सातारचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व.श्रीमंत छ प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज यांनी साकारली होती. त्यांची संकल्पना अस्तित्वात येत आहे याचा मनस्वी आनंद आहे असे भावपूर्ण उद्गार व्यक्त करतानाच, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कास येथे बोटिंग, व्हिव्हींग गॅलरी उभारणे इत्यादी प्रस्ताव लवकरच मंजूर करुन घेवून, स्थानिकांच्या रोजगार वाढीचे सर्व प्रयत्न केले जातील असा विश्वास व्यक्त केला.

याबाबत जलमंदिर पॅलेस येथुन दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की, सुमारे 1853 च्या सुमारास श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज (थोरले) यांनी मुळचे कासधरण साकारण्याचे सर्वप्रथम प्रयत्न केले, तसेच स्व.दादामहाराज हे सातारा नगरपरिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष असताना, मुळ धरणाची उंची वाढवण्याची आणि कास बंदिरस्त पाईप लाईनची संकल्पना मांडली होती. कास बंदिस्त पाईपलाईनची संकल्पना आम्ही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि पुढे महसुल राज्यमंत्री असताना साकारली. कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामास देखिल सुमारे दोन वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. या उंची वाढवण्याच्या कामापैकी 80 टक्कयापेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. शेवटच्या टप्यातील पावसाळयानंतरच्या कामाचा आज शुभारंभ होत आहे. लवकरच म्हणजे येत्या दोन-तीन महिन्यात हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. पूर्णपणे ग्रव्हीटीने सुमारे 27 किलोमिटरपेक्षा जास्त अंतरावरून, नैसर्गिक उताराने कासचे पाणी अहोरात्र सातारकरांची तहान भागवत आहे. आता कास धरण क्षमतेतेत भक्कम वाढ होत असल्याने,सातारकरांना पाण्याची कमतरता भासणार नाही याचे समाधान आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने स्थानिकांना लाभ मिळेल अश्या दृष्टीकोनामधुन या ठिकाणी बोटींग, तसेच व्हीव्हिंग गॅलरी उभारण्यात येणार आहे. जेणेकरुन शात्रीय दृष्टीकोनामधुन पर्यटकांना येथील निसर्गसंपन्नतेचा अनुभव घेता येईल आणि स्थानिकांनाही भक्कम रोजगाराची संधी उपलब्ध होईल असे प्रयत्न आमचे सुरु आहेत. लवकरच त्या कामांचा देखिल शुभारंभ होईल असा विश्वास आहे. त्याचबरोबरीने स्थानिक ग्रामस्थांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. कास धरण उंची वाढवताना ग्रामस्थांच्या सुविधेचे जे प्रश्न आहेत ते निश्चितपणे प्राधान्याने सोडवण्यात आले आहेत, राहीलेले प्रश्न देखिल प्राधान्याने सोडवले जातील असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी म्हटले आहे.

Adv