महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे देशासाठी असलेले अमूल्य योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी मानसपुत्राने केंद्र सरकारकडे शिफारस का केली नाही, असा सवाल महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.
खासदार उदयनराजे भोसले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून या ठिकाणी महायुतीचा संकल्पनामा अर्पण केला त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
उदयनराजे म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी कराड येथे होणाऱ्या जाहीर सभेत मी करणार आहे. अशी मागणी करण्याची वेळ आत्ताच का काढली असे विरोधक म्हणत आहेत. मात्र यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने जोगवा मागून आम्ही यापूर्वी कधीही मते मिळवले नाहीत. लोकसभा मतदारसंघातील 18 लाखापेक्षा जास्त मतदारांपैकी एकही चारित्र्यवान उमेदवार मानसपुत्र म्हणून घेणाऱ्यांना मिळालेला नाही.
घोटाळा प्रकरणातील सहानुभूती मिळेल असं विरोधक सांगत आहेत, वास्तविक घोटाळेबाजांनी सहानुभूती ही अपेक्षा धरणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. विरोधक घडीचा डाव खेळत तर आहेत परंतु लोकांना रडवण्याचा डाव देखील खेळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न देण्याची उदयनराजे यांनी केलेली मागणी अत्यंत रास्त आहे. चव्हाण साहेबांचे देशासाठी योगदान अमूल्य आहे. त्यांनी जपलेली संस्कृती आणि जीवनमूल्य त्याच्या बळावर त्यांना भारतरत्न देण्याची कार्यवाही होऊ शकते.
स्वतःला पद्मविभूषण घेतले…
मानसपुत्राने स्वतःला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त करून घेतला; परंतु आपल्या गुरुला देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न केले नाहीत, अशी टीका देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
मोदींच्या सभास्थळाची पाहणी
कराड तालुक्यातील सैदापूर येथे 29 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभा स्थळाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे लोकसभा प्रभारी अतुल भोसले धैर्यशील कदम मनोज दादा घोरपडे आदींनी केली.