पस्तीस वर्षे आमदारकी ज्यांच्या घरात आहे त्यांना शामगावचा पाणी प्रश्न सोडवता आला नाही. हणबरवाडी, धनगरवाडी योजना हे स्वर्गीय पी.डी पाटील साहेबांचे स्वप्न पंरतु पंचवीस वर्षे आमदार त्यापैकी अडीच वर्षे मंत्री असून ज्यांना स्वताच्या वडिलांचे स्वप्न त्यांना पूर्ण करता आलं नाही ते कराड उत्तरच्या जनतेचे स्वप्न काय पूर्ण करणार? हे आमदार आजपर्यंत फसवत आलेत. जे आजपर्यंत आपल्याला पाणी देवू शकले नाहीत त्यांना आता २० तारखेला मतदानातून पाणी दाखवा असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी केले.
शामगाव ता.कराड येथील भाजप भाजप महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचारासाठी आयोजित कोपरा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनोजदादा घोरपडे, शेतकरी संघटनेचे नेते सचीन नवलडे, बाळासाहेब पोळ, राहुल यादव, उध्दव पोळ, तात्यासो पोळ, कृष्णत पोळ, डॉ. सचीन पोळ
सुरेश पोळ, सचिन डांगे, बापूराव पोळ, जगदीश लावंड, अक्षय मेनकुदळे, गणेश मम्हाणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोजदादा घोरपडे म्हणाले, कोणतेही व्हिजन नसलेले नेतृत्व आपल्याला घरी घालवायचे आहे.आजवर शामगावच्या ग्रामस्थांनी पाण्यासाठी खुप सोसले आहे. मागील काळात आंदोलन केले त्यावेळी विद्यमान आमदारांनी हात वर करुन तुम्हाला जे पाणी देतील त्यांच्याकडून घ्या असा सल्ला दिला. पंरतु महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही पदावर नसताना या आंदोलनस्थळी भेट देवून शामगावला पाणी आरक्षित करुन घेतले. आरक्षित झालेले पाणी शामगावच्या शिवारात खिळवायचे आहे. त्यासाठी महायुतीचा आमदार इथे झाला पाहिजे. अन्यथा आरक्षित झालेले पाणी येण्यासाठी आणखी ३० वर्षे वाट बघावी लागेल.
कराड उत्तर मधील ४३ गावांना २५ वर्षात आमदारांना पाणी देता आलं नाही. दुष्काळी भागासाठी अनेक गावे आजही पाण्यापासून वंचित आहेत. या गावांना पाणी देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून प्रचंड निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात आम्हीच कराड उत्तरचा पाणी प्रश्न सोडवू. आमच्या सरकारने सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या असून त्याचा प्रत्यक्ष फायदा लाभार्थ्यांना झाला आहे. पारदर्शी कारभार करणारे हे सरकार असुन महिला, युवक, शेतकरी, बेरोजगार, वयोवृद्ध, माता बालक या सर्वांचा विचार करून राबवलेल्या योजना यशस्वी ठरल्या आहेत.लाडक्या बहिणींसाठी आणलेल्या योजनेची विरोधकांनी खिल्ली उडवली.
सचीन नलवडे म्हणाले, मनोजदादा घोरपडे हा कराड उत्तरसाठी सक्षम चेहरा आहे. महायुतीच्या सरकारने कराड उत्तर मध्ये भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. गेल्या अडीच वर्षात देशाच्या, राज्याच्या विकासासाठी महायुतीची महत्त्वपूर्ण कामे झाली असल्याचे त्यांनी सांगितले. कराड उत्तरच्या रखडलेल्या विकासावर लक्ष केंद्रित करत शामगावसह इतर गावांचा पाणी प्रश्न भाजप महायुती सरकारने सोडवल्याचे सांगितले.
डॉ. सचीन पोळ म्हणाले, शामगावचा पाणी प्रश्न सुटला तर येथील बेरोजगार असणारा युवा वर्ग शेतकरी उद्योजक होईल. महायुतीच शामगावचा पाणी प्रश्न सोडवू शकते हे गावकरी ओळखून असून शामगावातून मनोजदादांना ८० टक्के मतदान देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
चौकट – अंतवडी रिसवडसह अन्य गावांमध्ये रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
– या विभागातील अंतवडी, रिसवडसह पांचूद, कामथी, सुर्ली, मेरवेवाडी, करवडी, शामगाव, वाघेरी, शहापूर, वडोली निळेश्वर, शहापूर सह अन्य गावांमध्ये काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थांनी प्रचार रॅलीत सहभागी होत मनोजदादा घोरपडे यांना पाठींबा दर्शविला.