प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दि. 1 मार्च रोजी महाशिवरात्री यात्रा होत आहे. त्यातच करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी समन्वय ठेवत नियोजन करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री क्षेत्र भीमाशंकर यात्रा नियोजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे, आंबेगावचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, आंबेगावच्या तहसीसदार रमा जोशी, खेडच्या तहसीलदार वैशाली वाघमारे, उपअभियंता एस.एस. पटाडे, पोलीस निरीक्षक सतीश गुरव, किशोर वागज यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते.
दि.26 व दि.27 फेब्रुवारी रोजी शनिवार, रविवार सुट्टी आहे. दि.1 मार्च रोजी महाशिवरात्र होणार आहे. सलग सुट्ट्या आल्या असल्याने भीमाशंकर यात्रेला मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांना त्रास होणार नाही, यासाठी प्रत्येक विभागात समन्वय असावा. यासाठी नियंत्रण कक्ष असणार आहे.